Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १४, २०११

दारुबंदी एल्गार

दारुबंदीसाठी २६ रोजी जेलभेरो

चंद्रपूर : वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानच्या वतीने जटपुरा गेट गांधी पुतळयासमोर घेण्यात आलेल्या सत्याग्रह शपथ कार्यक्रमात येत्या २६ जानेवारी रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील दारुबंदी एक महिन्याच्या आत करण्याचे आश्वासन मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलनकत्र्या महिलांना देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल घेण्यात आलेले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना दारूबंदीचे दिलेले आश्वासन सरकारने पाळावे, यासाठी आता महिलांच्यावतीने जेलभरो करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाची सुरवात १२ डिसेंबर २०१२ पासून करण्यात आली. अभियानादरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख पोष्टकार्ड पाठवून, त्यांनी दिलेल्या वचनाचे स्मरण करून आले. दोन वर्षांंंंंपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी, यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाच्या वतीने, दारूबंदीसाठी शासनस्तरावर आणि जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलने केली. या पाश्र्वभूमीवर सरकारच्यावतीने आंदोलक महिलांना दारूबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यासाठी शासनाने पालकमंत्री संजय देवतळे समिती नेमली. या समितीने आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. या अहवालावर हिवाळी अधिवेशन संपताच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. मात्र अधिवेशन होवूनही सरकार गप्प राहिल्याने, मुख्यमंत्री चव्हाण यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी जेलभरो करण्यात येणार आहे.



दारुबंदीविरुद्ध विक्रेत्यांचा
एतिहासिक एल्गार

दारूबंदी मागणीविरोधात मूक मोर्चा
दारू विक्रेत्यासह १२ हजार कामगारांचा सहभाग


शेकडो कारखाने व राष्ट्रीय उद्यान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची मागणी केली जात आहे. या मागणीविरोधात जिल्ह्यातील दारूविक्रेते व या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरले. दारूबंदीच्या मागणीविरोधात (दि.१४) चंद्रपुरात मूकमोर्चा निघाला. दारूविक्रेत्यांसह 12 हजार कामगार सहभागी झाले.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या शासनमान्य १०९ देशी दारू दुकाने, २४ वॉईन शॉप, ३२० वॉईन बार व १० बियर शॉपी आहेत. या व्यवसायावर तब्बल ४० हजार कुटुंबे अवलंबून आहेत. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यास या सर्व कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे. परिणामी हे सर्व कामगार अवैध व्यवसायात गुंतून वाईट मार्गाकडे वळतिल. सध्या जिल्ह्यातील देशी व विदेशी दारूच्या माध्यमातून शासनाला २६० कोटी रूपयांचा महसूल मिळत आहे. यात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ होत आहे. जर दारू दुकाने बंद झाली तर शासनाला दरवर्षी मिळणारा हा महसूल बंद होइल. जर शासनाला दारूबंदी करायची असेल तर अवघ्या महाराष्ट्रात दारूबंदी करावी किवा दारूचे कारखाने बंद करावे, अशी मागणीही चंद्रपूर डिस्ट्रीक्ट लिकर असोसिएशनतर्फे जयस्वाल यांनी केली. दारूबंदीनंतर उदभवणाऱ्या समस्यांची जाणीव करून देण्यासाठी मुकमोर्चा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे एक निवेदन सादर करनयत आले.. दारूच्या व्यवसायावर बार कामगारांसह इतर व्यवसायही अवलंबून आहेत. दारूबंदी झाल्यानंतर त्या व्यवसायांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे दारूबंदी करायची असेल तर महाराष्ट्रात करावी, अशी मागणी निवेदनातून शासनाला केलि.








श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची मागणी लावून धरली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये दारूबंदीचे ठराव त्यांनी घेतले आहेत. यासाठी त्यांनी पाच हजार महिलांचा मोर्चा दिसम्बरमधे विधिमंडळावर नेला होता. त्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला. त्यानुसार समिती गठित करण्यात आली.


खरेतर राज्यात पूर्वीपासूनच दारूबंदीसाठी कमी-अधिक प्रमाणात चळवळी सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी आक्रमकपणे दारूअड्डे बंद पाडले. परंतु अशा पद्धतीने दारूबंदी करताना संपूर्ण गावाचा विशेषतः महिलांचा सहभाग त्यात फारच कमी दिसून आला. दारूबंदीबाबतची गाजत असलेली प्रक्रिया आता राज्यातील गावागावांत पोचणार आहे. राज्य दारूबंदी संघर्ष समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे. पहिला टप्पा म्हणून येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील 50 गावांतील महिलांच्या मतदानाद्वारे दारूबंदी व्हावी, यासाठी दबाव आणण्यात येणार आहे. याचबरोबर दारूबंदीसाठी राज्यव्यापी महिलांचे संघटनही उभारण्याची समितीची धडपड आहे. ज्या गावात दारूबंदीसाठी आंदोलने सुरू होतील, त्या आंदोलनातही उतरण्याचा संघर्ष समितीने निर्णय घेतला आहे.










धान्यापासून दारूनिर्मितीला विरोध आणि मतदानाद्वारे दारूबंदी हे दोन्ही मुद्दे घेऊन राज्यातील 35 संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिळून काही महिन्यांपूर्वी राज्य दारूबंदी संघर्ष समितीची स्थापन केली आहे. सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लढणाऱ्या आणि राज्यात एक दबाव गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंनिस, अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार निर्मूलन समिती, डॉ. अभय बंग यांची "सर्च', वारकरी सांप्रदायाची व्यसनमुक्ती संघटना, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, जनवादी महिला संघटना, युवक क्रांती दल यासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते या समितीवर आहेत. समाजप्रबोधन, विकृतीवर आळा आणि प्रशासनावर वचक अशी त्रिसूत्री घेऊन या समितीने राज्यातील गावागावांत मतदानाद्वारे दारूबंदीबाबत जागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

-------- ---- -------










दारुबंदी समिति
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीवर विचार करण्यासाठी स्थापित देवतळे समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करावा लागणार आहे. समितीच्या स्थापनेबाबतचा आदेश 22 फेब्रुवारी रोजी जारी झाला. राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा दारूबंदी समितीची गठित करण्यात आली आहे. पहिली बैठक चार मार्चला येथील विश्रामगृहात पार पडली. समाजातील वेगवेगळ्या घटकांना विश्‍वासात घेऊन समिती आपला अहवाल तयार करेल, अशी चर्चा बैठकीत झाली.
समितीत डॉ. अभय बंग, डॉ. विकास आमटे, प्रा. मनोहर सप्रे, प्राचार्य मदन धनकर आणि सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य ए. जे. शेख यांचा समावेश आहे.
-- ----- --------------- ------
श्रमिक एल्गारची पदयात्रा
५ दिसेम्बार ला सकाळी साडेपाचला बालाजी मंदिर येथून पदयात्रेला सुरवात झाली. अध्यक्षस्थानी प्रा. जयश्री कापसे-गावंडे होत्या. याप्रसंगी श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा ऍड. पारोमिता गोस्वामी, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, जिल्हापरिषद सदस्य प्रा. दादा दहीकर, सुमनबाई टेकाम, कुमरे, विमल कोडापे, सुरेखा कुसराम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.महाराजांचे दारूबंदीचे विचार राज्य शासनाने स्वीकारून महाराजांच्या कर्मभूमीत दारूबंदी जाहीर करावी, यासाठी श्रमिक एलगारने क्रांतिभूमी चिमूर ते विधानसभा नागपूर अशी पदयात्रा काढली. परोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या "वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियाना' ला चार हजार 805 कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला. जिल्ह्यातील सर्व दारूचे परवाने रद्द करून दारूबंदी करावी, या मागणीवर विचार करण्यासाठी विशेष समिती नेमली जाईल, अशी घोषणा उत्पादनशुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधानसभेत केली. हे श्रमिक च्या एलगार चे ५० टक्के यश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने नागपूरला पदयात्रा निघाली नाही. मात्र, श्रमिक एल्गारच्या पुढाकाराने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियानाअंतर्गत निघालेली पदयात्रा ही ऐतिहासिक आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील तब्बल पाच हजार कष्टकरी महिलांचा मोर्चा अनेक दिवसांची पायपीट करीत गुरुवारी विधानभवनावर गेला होता. अनेक महिला तर अनवाणी पायाने चालल्या. पायाला फोडे आली. प्रकृती बिघडल्या. वेदना विसरून चालत राहायचे. दिवसभर, रात्री गावात प्रबोधनाचे कार्यक्रम घेत जनजागृती करायची. उघड्यावरच मुक्काम ठोकायचा. पाच दिवसांचा या प्रवासाने अनुभवांची शिदोरी मिळाल्यासारखी वाटली, हे बोल आहेत चिमूर ते नागपूर 130 किलोमीटरचे अंतर पदयात्रेतून पार करणाऱ्या महिलांचे. पदयात्रेला काही प्रमाणात यश मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर आहे. प्रवीण चिचघरे, यमराज बोधनकर, नीलाबाई ठाकरे, कपिला भसारकर, माधुरी तोरे, संगीता गेडाम या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपले अनुभव कथन केले.



श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंतांची कर्मभूमी चिमूर येथून पाच डिसेंबरला पदयात्रेला सुरवात झाली. भद्रावतीपासून तर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणांहून एकत्र आलेल्यांनी दारूबंदीचे नारे देत पदयात्रा केली. भिसी मार्गावरून चिंचाळा या गावात पहिला मुक्काम झाला. महिला आपली पाच दिवसांची रोजीरोटी सोडून या पदयात्रेत सहभागी झाल्या. 10 वर्षांच्या चिमुकल्यापासून 70 वर्षांच्या पार्वताबाई सिडाम, मीराबाई गावतुरे, शांताबाई कोसरकर, पार्वताबाई व्याहाडकर, रुकमाबाई लोनबले व वल्लुबाई सीमोनकर, मोहुर्ले, धृपता नैताम आंच्यासह अनेक वृद्ध महिला धडाडीने या पदयात्रेत सहभागी झाल्या. 130 किलोमीटर अंतर पार करीत नागपुरात पोचल्यानंतर नागपुरातील अनेक नागरिक मदतीसाठी पुढे आले. दु:ख, वेदना, थंडी व अचानक आलेला पाऊस यातही हे पाच दिवस कसे गेले हे समजलेच नाही, असे महिलांनी सांगितले. या पदयात्रेमुळे शासनाला समिती गठित करावी लागली, याचा आनंद महिलांना आहे.



सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका
चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याच्या होत असलेल्या मागणीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकाच्या निमित्ताने दारूबंदीवर झडलेली चर्चा अतिशय भावनिक पातळीवर गेली. महसुलाचा अट्टहास सोडून शासनाने सर्वत्र दारूबंदीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अनेक आमदारांनी चर्चेच्या निमित्ताने केले. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदीविषयी अशासकीय विधेयक सभागृहात मांडले. विधेयकावरील चर्चेच्या निमित्ताने मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या दारूबंदीच्या मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.


2 कोटी लिटर मद्य रिचविले
चंद्रपूर - जिल्ह्यातील तळीरामांनी कमालच केली. 2009-2010 या आर्थिक वर्षात चक्क एक कोटी 83 लाख 85 हजार 835 लिटर मद्य रिचविले. त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा यावेळी तळीरामांनी 18 लाख लिटर मद्य अधिक पचविले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2008-2009 या आर्थिक वर्षात एक कोटी 65 लाख 90 हजार 896 लिटर मद्याची विक्री झाली आहे. 2009-2010 या आर्थिक वर्षात ही आकडेवारी 18 लाख लिटर जास्त आहे. अवैध दारूप्रकरणातील 2009 मध्ये 673 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. याअंतर्गत 307 जणांना अटक झाली. 365 अद्याप फरार आहेत. सहा लाख 46 हजार 130 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 2010 मध्ये मात्र अवैध दारूविक्रीच्या गुन्ह्यामध्ये घट झाली. 612 प्रकरणे नोंदविली गेली. अटक केलेल्या आरोपींची संख्याही घटून 267 एवढी झाली. फरार आरोपींची संख्या 345 एवढी आहे, तर पाच लाख 33 हजार 869 रुपयांची मालमत्ता अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली आहे.
2009 -2010 या आर्थिक वर्षात सर्वाधिक विक्री देशी दारूची झाली. तब्बल एक कोटी 30 लाख 29 हजार 173 लिटर देशी दारू पिऊन "स्वदेशी'बद्दल तळीरामांनी आपले प्रेम दाखविले. विदेशी मद्याची विक्री 29 लाख 34 हजार 781 लिटर एवढी झाली. त्या खालोखाल बिअरचा घोट तळीरामांनी घेतला. 24 लाख 21 हजार 811 एवढी बिअर या वर्षभरात रिचविली गेली. 2008-2009 मध्ये तळीरामांनी देशीला पसंती देत एक कोटी 21 लाख 62 हजार 968 लिटर मद्य फस्त केले. मात्र, विदेशी दारूची विक्री 24 लाख 64 हजार 103 लिटर झाली होती. बिअर 19 लाख 63 हजार 825 लिटर विक्री झाली. नव्या वर्षाचे स्वागत तळीराम मद्याचे घोट घेऊन करतात. वर्षभर न पिणारेही एकच प्याला म्हणून या दिवशी हात लावतात. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दारूची विक्री सर्वाधिक होते. डिसेंबर महिन्यात देशी, विदेशी आणि बिअर मिळून 25 लाख 88 हजार 431 लिटरची विक्री झाली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला व्यसनमुक्तिचे विचार दिले. महाराजांचे ग्रामस्वच्छतेचे विचार राज्य शासनाने स्वीकारून राज्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.