Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २३, २०११

आदिवासी महिलांच्या सुधारित शेतीने दिलीय भात उत्पादकांना प्रेरणा

Monday, April 18, 2011 AT 12:00 AM (IST)
महाराष्ट्र - आंध्र प्रदेश सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्‍यातील सोनापूर देशपांडे या गावातील महिला शेतकऱ्यांनी एसआरआय पद्धतीने म्हणजे सुधारित पद्धतीने भाताची शेती करीत स्वतःचा त्याचबरोबर गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. सेंद्रिय शेतीवर भर दिल्याने त्यांनी पिकविलेल्या भाताला दरही चांगला मिळाला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने व कृषी विभागाच्या सहकार्याने या महिला शेतकऱ्यांनी परिसरातीलही अनेक गावांच्या प्रगतीला चालना दिली आहे.



महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर गोंडपिपरी तालुक्‍यातील सोनापूर देशपांडे हे एक हजार लोकसंख्येचे गाव असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे. सोनापुरात आदिवासी समुदायातील लोकांची संख्या अधिक आहे. प्रौढ महिलांची संख्या सुमारे 175 आहे. सुमारे पाच वर्षांपासून संपूर्ण तालुक्‍यावर मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याचा जोरदार फटका बसला आहे. सोनापूरची परिस्थिती काही वेगळी नव्हती. शेतीचा मुख्य हंगाम संपल्यानंतर येथील महिलांना रोजगारासाठी अन्यत्र जावे लागायचे. प्रसंगी परजिल्ह्यांमध्येही कामाचा शोध घ्यावा लागायचा. अशा संकटकालीन परिस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला.



इथल्या भात शेतीत महिलांचा सहभाग वाढविणे व त्यातून त्यांच्या शेतीचा तसेच कुटुंबाचा विकास साधणे हा उपक्रम सुरू केला. त्यातून गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी बचत गटांची स्थापना केली. हळूहळू महिला ंचा सहभाग अधिक वाढू लागला. गावात एकूण चौदा बचत गट निर्माण झाले. यात संबंधित महामंडळाचे सहा गट आहेत व त्यात 66 महिलांचा समावेश आहे. या महिलांना महामंडळाने कृषी विभागाच्या सहकार्यातून भाताच्या एसआरआय पद्धतीचे प्रशिक्षण दिले. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर दिला. प्रात्यक्षिकांवर भर दिला. त्यातून महिला वर्गात प्रचंड आत्मविश्‍वास निर्माण झाला.

कृषी सहायक प्रफुल्ल तावाडे, संतोष कोसरे, "माविमा'च्या तालुका व्यवस्थापक सीमा इंगोले, सपना भगत आदींनी यासाठी पुढाकार घेतला. सेंद्रिय शेतीचा वापर करण्यासाठी त्यांनी गावात जनजागृती केली. महिलांना माती परीक्षण, गांडूळ युनिट उभारणे, रोपवाटिका तयार करणे या गोष्टी शिकवताना रोवणी केलेल्या धान्याचे पीकही दाखविण्यात आले. कोणत्याही नव्या प्रयोगांची अंमलबजावणी करताना विरोध हा होतोच. सोनापुरातील काही लोकांनीही सेंद्रिय पद्धतीच्या उत्पादनावर अविश्‍वास दाखवत विरोध व्यक्त केला. एसआरआय पद्धतीत बियाणे प्रमाण कमी लागत असल्याने उत्पादन अपेक्षित मिळणार नाही याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. यामुळे महिलांत सुरवातीला नैराश्‍य आले, पण दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शेती पिकलीच नाही असे समजून सुरवातीला एक एकर शेतीत हा प्रयोग करण्याचे ठरले. गावातील 31 महिलांनी प्रेरणा घेत आपल्या एक एक एकर शेतीत हा उपक्रम राबविला. यानुसार सेंद्रिय प्रयोगासाठी 18.40 हेक्‍टर क्षेत्र निवडण्यात आले. श्री. तावाडे यांनी तांत्रिक मार्गदर्शन करताना शेतीची पूर्वमशागत, बियाणे घेताना घ्यावयाची काळजी, त्याची उगवणक्षमता चाचणी, बीजप्रक्रिया, रोपवाटिका, एसआरआय पद्धतीने लागवड, पाणी नियोजन, आंतरमशागत, सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर, मित्रकीटक व शत्रूकीटक यांची प्रत्यक्ष शेतावर ओळख करून देणे आदी गोष्टी महिलांना शिकवल्या. तसेच निंबोळी अर्काचा वापर, दशपर्णी अर्क तयार करणे, गांडूळ खते, व्हर्मिवॉश, पीक कापणी, काढणी व पिकाची साठवणूक करणे आदी गोष्टींबाबतही प्रशिक्षित करण्यात आले. कोनोविडरचा वापर करून तणनियंत्रण करण्यात आले. आदर्श पीक व्यवस्थापनाचा अवलंब केल्याने उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनवाढ होण्यास मदत झाली. ज्या शेतात एकरी पाच ते सात क्विंटल उत्पादन व्हायचे तिथे एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळाले. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही प्रयोगात आलेल्या निष्कर्षांचे आश्‍चर्य वाटले व ही पद्धत किफायतशीर असल्याची त्यांनी मनोमन खात्री पटली.



एसआरआय पद्धतीमुळे बियाण्यात बचत होतेच. शिवाय पाणी, खते, मजुरी यांच्या वापरात पर्यायाने खर्चात बचत होते. त्याचबरोबर उत्पादनवाढही होण्यास मदत होते. सेंद्रिय निविष्ठांचा वापर केल्याने रासायनिक अंश कमी करण्याच्या अनुषंगाने भाताची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न झाला. बचत गटाच्या महिलांकडून गावातील अन्य महिलांनीही या सुधारित शेती पद्धतीची माहिती घेत त्यांच्या वाटेने जाणे पसंत केले. सोनापूर गावाने केलेल्या परिवर्तनशील प्रयोगामुळे परिसरातील अनेक गावांना नवी चालना मिळाली.



बेबीताईंची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

सोनापूर देशपांडे गावातील 30 वर्षीय बेबीताई धनंजय चौधरी या महिलेचे गावातील या शेती परिवर्तनात मोठे योगदान आहे. बेबीताईंनीच सर्वप्रथम सुधारित आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घेतला. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना संघटित केले. त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. घरातून, गावातून विरोध होऊनही कुणालाही न जुमानता गावात सुधारित शेतीबाबत जागृती करण्यात त्यांचे काम महत्त्वाचे ठरले आहे. शेतीसोबतच ग्रामविकासासाठी बेबीताईंनी स्वतःच्या बचत गटातून 6000 रुपये देऊन व प्रति कुटुंब 500 रुपये वर्गणी जमा केली. त्यातून प्रत्येकाच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीच्या साह्याने उपलब्ध केली. गावात माविमा मित्रमंडळाची स्थापना करून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. सोनापूरसारख्या अ तिदुर्गम भागात राहून बेबीताईंनी बचत गटाच्या माध्यमातून विकासाचा व परिवर्तनाचा झेंडा रोवला. त्यांच्या या यशोगाथेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. रोम येथील ऑयफॉड इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट यांच्या आगामी वार्षिकांकात बेबाताईंच्या यशोगाथेची विशेष स्टोरी प्रकाशित होणार आहे. यामुळे सोनापूर देशपांडे या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रोम (इटली) येथील आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी या कृषी क्षेत्रातील संस्थेच्या पथकाने गावाला भेट देऊन गावात घडलेल्या यशकथेची दखल घेतली आहे.

- प्रफुल्ल तावडे, 9403785167

- कांता मिश्रा, 9420188331



ठळक नोंदी

- सुमारे 18.40 हेक्‍टर शेतातून महिलांनी एसआरआय पद्धतीचा वापर करून एकरी 15 क्विंटल याप्रमाणे 690 क्विंटल भाताचे उत्पादन केले. सद्य परिस्थितीतील भाताचा दर 1100 रुपये प्रति क्विंटल आहे; मात्र सें द्रिय पद्धतीतून महिलांनी पिकविलेल्या भाताला तब्बल 1500 ते 1700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गावातच धान्य विक्रेत्याने या महिलांकडून धान्य विकत घेतले.

- विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी झालेल्या एका प्रदर्शनात सोनापूर देशपांडे येथील महिलांनी पिकविलेल्या तांदळाला साठ रुपये प्रति किलो एवढा विक्रमी भाव मिळाला.



बचत गटांद्वारे महिला घेताहेत आघाडी

बोर्डा हे गाव चंद्रपूर जिल्ह्यापासून 26 कि.मी. अंतरावरील आदिवासी गाव आहे. येथे महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित 11 बचत गट आहेत. त्याअंतर्गत महिला सक्षमीकरण समिती स्थापन करण्यात आली. त्याद्वारे सुरवातीला गाव सभा घेऊन त्यांना एसआरआय पद्धतीने भात लागवड महिला करू शकतील काय या मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे गावातील 33 महिला तयार झाल्या. त्यांनी एक एकर क्षेत्रावर हा प्रयोग नक्कीच करू असा आत्मविश्‍वास दिला. त्यानंतर माती परीक्षण, त्यासाठी मातीचे नमुने कसे घ्यावे, एसआरआय पद्धतीने भात लागवड म्हणजे काय हे महिलांना प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देण्यात आले. महामं डळाच्या मार्गदर्शनातून महिलांना शेती अवजारे देखील पुरवण्यात आली. डिझेल इंजिन, फवारणी पंप, कोनोवीडर आदींचा त्यात समावेश होता. गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले. त्याकरिता गावामध्ये शेतीशाळा घेण्यात आली. शेतीचा मुख्य हंगाम संपल्यानंतर येथील महिलांना कामासाठी भटकंती करावी लागायची. वेळप्रसंगी परजिल्ह्यात जावे लागायचे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता गावातच त्यांना रोजगार उपलब्ध झाला असल्याची प्रतिक्रिया या प्रकल्पातील भारती वासेकर यांनी दिली आहे. सावली तालुक्‍यातील बोथली हे गाव. गावात रमाबाई महिला स्वयंसाह्यता गटाची फेब्रुवारी 2010 ला स्थापना झाली. गटात दहा सभासद आहेत. या गावात ऑक्‍टोबर 2003 मध्ये समृद्धी नावाचा गटही स्थापन झाला आहे. त्याच्या तुलनेत रमाबाई गटाची कमी कालावधीत प्रगती झाली आहे. या गटाने दोन दिवसांचे गांडूळ खत प्रशिक्षणही पूर्ण केले.

Thank you.

Your Comment will be published after Screening.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.