Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ११, २०१४

नागपूर जिल्ह्यात 31 टक्केच "गावकरी'

रोजगारासाठी तरुण शहरात : ग्रामीण भागात मूलभूत सुविधाच नाहीत 

 देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जुलै 2014 

नागपूर- 46 लाख 53 हजारांहून अधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यातील तरुण रोजगारासाठी नागपूर आणि शहरी भागात दाखल झाल्याने ग्रामीण भागातील लोकसंख्या केवळ 31 टक्केच उरली आहे. त्यानुसार ग्रामीण लोकसंख्या 14 लाख 74 हजार इतकी आहे. रोजगाराचा अभाव असल्याने खेडी ओस पडू लागली आहेत.

नागपूरची ओळख धनाढ्य लोकांचे शहर म्हणून आहे. सुरुवातीच्या काळापासूनच नागपूर हे विदर्भातील मुख्य व्यावसायिक केंद्र राहिले आहे. त्यामुळे रोजगारासाठी कामगारांचा लोंढा या शहरात वाढला. 2001 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 40 लाखांवर होती. स्त्री-पुरुष हे प्रमाण हजारामागे 932 महिला इतके होते. ते आता हजार पुरुषांमागे 948 महिला असे झाले. तेच प्रमाण ग्रामीण भागात हजार पुरुषांमागे 942 स्त्रिया इतके आहे. साक्षरतेचे सरासरी प्रमाण 89.52 टक्‍के इतके असून, 68 टक्के नागरिक शहरी भागात वास्तव्यास आहेत. लोकसंख्येतील 52.5 टक्‍के लोकसंख्या 15 ते 59 वर्षे वयोगटातील आणि 10.35 टक्‍के लोकसंख्या सहा वर्षांच्या आतील वयोगटात आहे. गत 10 ते 12 वर्षांच्या काळात 14 ते 15 टक्के लोकसंख्या वाढली. मात्र, ग्रामीण भागातील विकास झालेला नाही. लोकसंख्या वाढली तरी पिण्याच्या पाण्याची वाढीव व्यवस्था, रोजगार, शिक्षण, रस्ते आदी सुविधा झालेल्या नाहीत. त्यामुळे गावकरी आजही विकासासाठी "तहानलेले‘च आहेत. ग्रामीण भागातील जनता शेती हा एकमेव व्यवसाय करते. दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनही होत नाही. त्यामुळे तरुणवर्ग शेती सोडून रोजगारासाठी शहरात दाखल होत आहे. त्यामुळे खेडी ओस पडून, शहर फुगू लागले आहे.

पाणी, रोजगार, रुग्णालय, शिक्षण सुविधा हवी
कामठी तालुक्‍यात पेंच कालवा आणि तोतलाडोह हे प्रकल्प असतानाही लोकसंख्येनुसार वाढीव पाणीपुरवठा योजना झाली नाही. त्यामुळे तालुक्‍यात पाणीटंचाईचा प्रश्‍न नेहमीच भेडसावतो. रामटेक तालुक्‍यात 14 गावांसाठी नगरधन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वर्षातून 10 महिने नियोजनाअभावी बंद असते. काटोल तालुक्‍यात 27 गावांना जोडणाऱ्या पेयजल योजनेचे काम कासवगतीने सुरू आहे. उमरेड तालुक्‍याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. येथील एमआयडीसीत उद्योग नसल्याने बेरोजगारांची फळी तयार झाली आहे. सावनेरसारख्या तालुक्‍यात उच्च शिक्षणाची सोय नाही. याच समस्या जिल्ह्याच्या अन्य गावांतही आहेत.

-----------------------------------------------------------------
  • बेरोजगारी शिक्षण न मिळाल्याने येते. पण, त्याउलट शिक्षण घेतलेले जास्त बेरोजगार आहेत. विद्यापीठातून पदवीधर झालेल्या प्रमाणाच्या दुपट्टीने वर्षाला बेरोजगारी वाढत आहे. गावागावांत तरुण सक्षम झाला आहे. मात्र, रोजगार नसल्याने तो शहरात मिळेल ते काम करतो आहे. त्यामुळेच जास्तीचे शिक्षण घेऊन काय करायचे, असा प्रश्‍न तरुणांना पडतो. त्यासाठी शासनाने अभ्यासक्रमात रोजगाराभिमुख अभ्यासावर जोर द्यायला हवा. 
- कपिल उपासे
बेरोजगार संघटना, नागपूर.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.